Showing posts with label Fort of Maharashtra. Show all posts
Showing posts with label Fort of Maharashtra. Show all posts

Monday, August 1, 2016

दुर्ग संवर्धनातील आव्हाने!!!

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हाने:
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हानांबद्दल थोडक्यात सांगावयचे झाले तर; “दुर्गमता, लोकसहभाग, अनास्था, वेळ, आर्थिक बाबी, सातत्य, संघटन, जनजागृती, माहिती व प्रसारण, मर्यादा, कश्याप्रकारे आणि कश्याचे संवर्धन” अश्या शब्दांमध्ये मांडता येते. त्यात दुर्गसंवर्धनाची व्याप्ती बघता हे काम एकट्या दुकट्य़ाचे नाही तसेच एखाद्या शासकीय किंवा विनाअनुदानीत संस्थेचेही नाही. एखादा किल्ला निवडला असता त्याकिल्ल्याचे भौगोलिक स्थान, उंची, त्या प्रदेशाबद्दलची माहीती व इतिहास, त्याकिल्यावरील वास्तुंचा अभ्यास, वृक्ष आणि जंगल संपदा, वन्यजीव, किटक अश्या महत्वाच्या बाबींचा विचार आधी करावा लागतो. तसेच पर्यटनातुन असणारा लोकांचा रातबा अश्या गोष्टीं विचारात घ्याव्या लागतात. किल्ल्य़ावर संवर्धनामध्ये किल्ला हा एक केंद्रबिंदू म्हणुन पकडला असता त्याच्या भोवताली असलेल्या प्रदेशांचा अभ्यास असलेले व्यक्तींना एकत्र आणुन सर्व समावेशक आणि सर्वमान्य आरखडा बनवावा लागतो. किल्ल्य़ावरील एखादे पाण्याचे टाके स्वच्छ करावयाचे असल्यास त्या पाण्याची पत, त्यातील गाळ, त्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक पुरावे देणारे वस्तू, त्या टाक्याची घनता / व्याप्ती असे सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आर्किओलोजी, जल तज्ञ, स्थापत्य तज्ञ अश्या लोकांचे मत घ्यावे लागते. अश्या गोष्टी पुर्णत्वाला जाण्य़ाकरता लोकसहभाग आणि सातत्य जरुरीचे असते. किल्ला म्हणला तर तो दुर्गम प्रदेशामध्ये असणार; एका दुर्गम प्रदेशामध्ये असल्याने तेथे जाऊन काम करणाय़ाची इच्छा असली तरी उमेद बरय़ाचदा लोकांच्यात रहात नाही. आम्ही संवर्धन उपक्रम राबवीत असलेले हे किल्ले मुख्यत्वे गिरीदुर्ग श्रेणीतले असल्याने तेथे पोहचणे आणि काम करणे म्हणजे मोठे आव्हान असते. बरयाचदा असे दिसुन आले आहे की अश्या एखाद्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेला व्यक्ती अश्या कामांपासुन दुर जातो किंवा त्याच्यात सातत्य रहात नाही. ह्यामध्ये कोणाला दोष देऊन उपयोग नाही कारण हे कामच मुळी कष्टाचे आहे.
किल्ल्याला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी भेट देणारे आहेत. काही एकटे येतात तर काही मोठ्याला संखेत येतात. त्यात वेगवेगळ्य़ा विचारांचे लोक येत असल्य़ाने त्यांच्याकडुन अनावधानाने किंवा जाणिव पुर्वक वास्तूंची छेडछाड होत असते. अश्या पर्यटनांतून बरय़ाचदा प्लास्टीक कचरा, वास्तूंची पडझड किंवा एखादा अपघात अशी आव्हाने उभी ठकतात. त्यासाठी आपण जात असलेल्या प्रदेशाचा अभ्यास त्याची दुर्गमता लक्षात घेण्याची गरज आहे. अश्या प्रकारचे पर्यटन करणारया बरय़ाच संस्था पुणे – मुंबई शहरात आहेत. पण त्यातुन सातत्याने दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये सहभागी होणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्य़ा इतकेच आहेत. त्यांच्यातले कित्येक लोक आपण किती किल्ले सर केले, अमुकअमुक दिवसात ४-६ किल्ले अश्या प्रकारचे चढाओढ लावणारे दिसतात. पण एखाद्या किल्लावर संवर्धना करीता अनेकवार  जाणारया तुमच्या-आमच्यातील लोकांशी ते काय स्पर्धा करणार!! एकुण आपल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दल असलेली अनास्थाच ह्यातुन दिसुन येते. अश्या नेहमी किल्ल्यांना भेटी देणारय़ा लोकांमधुनच किल्यावर चालेलेल्या कामात सहभाग होण्य़ाचे आव्हान सर्व संस्थांसमोर आहेते. किल्ल्य़ावर कामाला येणारा मनुष्य हा सर्वसामान्य नाहीतर अश्या दुर्गम प्रदेशांना नेहमी भेटी देणाराच आहे आणि हाच व्यक्ती हे काम करू शकतो असे माझे मत आहे. हे सदरहू काम शहरापासुन लांब असल्याने जाण्यायेण्य़ामध्ये आणि तेथे काम करताना येत असलेल्या श्रमसीमांमुळे हे काम दिर्घकाळ चालते. प्रत्येकजण आपापल्या कामांतुन वेळ काढुन येत असल्याने एखादी मोहीम ही दिर्घवेळ चालते. त्यात बरय़ाचदा सातत्य न राहिल्याने काम अर्धवट रहाते हे सत्य आहे. सिंहगडाचा आज जो विकास झाला त्याची मुख्य कारणे म्हणजे शहरापासुन जवळ, किल्ल्य़ावर पोहचता येण्य़ाचे सुकर हमरस्ता आणि तेथे असणारे पर्यटन! पण आपण करीत असलेल्या किल्ल्यांना हे लाभलेले नाही.

अश्या कामांमध्ये सर्वात मोठे कोणते आव्हान असेल तर आर्थिक मदतीचे!! संवर्धनाचे काम शहरापासुन लांब आणि कित्येक पट उंचीवर असल्याने ह्या कामात येणारा खर्च चौपट असतो. किल्ल्यावर १० हजार रू. संवर्धन साहित्य पोहचवयास संस्थेला ८०  ह्जार रुपये लागले आहेत ही वस्तू स्थिती आहेत. तिकोनावर देऊळाचे छत दुरुस्तीसाठी त्याकिल्ल्यावर नेहमी येणारय़ा एका संस्थेने बांधकामसाहित्यासाठी आर्थिक मदत केली पण श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ह्या सहित्याचा वाहतुक खर्च वाचावा आणि उपलब्ध निधी जास्तितजास्त किल्ल्यावर वापरता यावा ह्याकरीता स्वत: ते साहित्य डोक्य़ावरुन वाहुन न्हेऊन काम पुर्णत्वास नेले! हे सत्य आहे. आजमितीस संस्थेने कित्येक लोकांना, छोटे-मोठे उद्योगधंदे असणारे व्यक्तींना उद्देश पटवुन दिल्याने आणि त्याच प्रकारचे काम करून दाखवल्याने संस्थेल मासिक वर्गणीदार आणि देणगीदार जोडता आले आहेत. संस्था आज इ.सि.एस. (ECS) पद्धतीने मासिक वर्गणी आपल्या सभासदांकडुन जमा करते. पण कामाचा आवाका जसजसा वाढतो तसे हे उपलद्ध निधी कमी पडत आहे असे बरय़ाचदा जाणवते.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जनजागृती आणि माहिती प्रसारण. जनसामान्यांना ह्या चळवळीमध्ये सामिल करून घेण्यासाठी आपला हेतू त्यांच्यापर्यंत पोहचवण्य़ा करीता वृत्तपत्र, इंटरेनेट अशी माध्यमे महत्वाचा वाटा आहे. आजमितीला प्रत्येक तरूणाच्या हाती मोबाईल आणि त्यावरुन संपर्क साधता येतील अशी सोशल साईट माध्यमे आहेत. आपल्या संस्थेचा हेतू संकेस्थळाच्या (Website) माध्यमातून अनेक संस्था वापर करत आहेत. पण त्यातुन अश्या उपक्रमांमध्ये सामिल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. एखाद्या वेळेस केलेल्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद मिळेल पण त्यांच्या पुढील कामांसाठी हेच सातत्य राहिल ह्याची शाश्वती नसते. ह्यासाठी सर्व संस्थानी एकत्रितरित्या सुयोग्य मार्ग शोधला पाहिजे. वृत्तपत्रे ह्यात मोलाचा सहकारी पण प्रत्येक वेळेला ह्यांचा प्रतिसाद मिळेल असे मानता येत नाही. बरेच वृत्तपत्रे ज्याभागात काम चालू आहे त्या भागातील पुरवणी मध्ये ह्या कामाची बातमी दिली जाते. त्यामुळे सर्वदुर बातमी जात नसल्याने बरेच उत्साही लोक अश्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे श्रेय त्यांना मिळत नाही. वृत्तपत्र जसे समजाचा आरसा आहे तसेच संवर्धनाच्या कामात कार्यरत असणारय़ा संस्थांचा सुद्धा आरसा बनावा अशी इच्छा आहे.

कळावे,
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे.
॥ ऐतिहासिक वास्तुंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील॥
WWW.Shivdurg.org
WWW.Facebook.com/shivdurg

Tuesday, June 30, 2015

"दुर्गराज राजगड"

राजांचा गड म्हणून आपल्याला माहित असलेला किल्ला म्हणजे "दुर्गराज राजगड". या किल्यांने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून पाहिले. स्वराज्याच्या चढता आलेख या किल्याने अनुभवलाही!!! जर दगडांना, डोंगरदरी, तटबुरुज यांना मृत्यू असता तर यांनी चित्रगुप्ताला अभिमानाने सांगीतले असते आम्हाला स्वर्ग नको कारण आम्ही आमच्या जीवनात छत्रपतींचा स्पर्श आणि सहवास अनुभवलाही याहून मोठे आम्हास स्वर्गात ते काय मिळणार!!! 🙏

पणं या किल्याची आजची परिस्थिती पहाता आपणं खुप कृतघ्नपणाची सिमा गाठली असे वाटते. आपणं जयजयकारातच आडकुन पडलो आहे असे भासते.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने राजगडावर २०१० सालापासून या किल्यावर संवर्धनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एक एक महिन्यात किल्यावरील विविध वास्तूंना पूर्नउजेडात आणण्यास सुरवात झाली. पाली मार्गातील २५४+ पायारी असो की पद्मावती माचीवरील वाड्यांची जोती, पाण्याचे स्त्रोत किंवा बुरुजांची स्वच्छता करण्यात आली.
       

 २०१२ सालात संस्थेने बालेकिल्यावरील वास्तूंच्या संवर्धनाकडे आपला मोर्चा वळवला. बालेकिल्याची स्वच्छता करताना बरयाच वास्तू स्वच्छ करण्यात आल्या. अंबारखाना, बाजारपेठे सारखे असणारे लागून असलेली वाडे स्वच्छ करण्यात आले.

      या संदेशांबरोबर जोडलेली छायाचित्र आपल्याला नक्कीच कामाचा आढावा देईल. अशा मोहिमात आपल्यासारख्या लोकांचा सहभाग असावा आणि ही दुर्ग संवर्धनाची चळवळ पुढे जावी या उद्देशापोटी हा लेखन प्रपंच!

बहुत काय लिहणे आपणं सुज्ञ असा!!!!


आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Sunday, February 19, 2012

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:

नमस्कार,


श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:



२०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र, शिवजयंती तसेच जोडून आलेल्या शनिवार आणि राविवार याचे औचित्य साधून संस्थेने मोठी नागरी मोहिम आखली होती. यामध्ये आधीपासुन वृत्तपत्रातुन तसेच नविन संभाषणाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात आले. मोहिमेच्या सुरवातीला १५०+ लोकांनी नोंदणी केली. ज्या दिवशी मोहिम सुरु झाली तो वार होता शुक्रवार, मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये संस्थेने कामास सुरवात केली. शनिवार रविवार या मुख्य दोन दिवसात श्रमदानासाठी आलेल्या लोकांची संख्या होती तब्बल २६०. या मोहिमेत संस्थेने पद्मावती माची, संजीवनी माची बालेकिल्ला यावर संवर्धन मोहिमा राबवल्या.



१) पद्मावती माची: किल्यावरील दृश्य आणि गाठलेल्या अवस्थेमधला कचरा गोळा करण्यात आला. प्लास्टिक कचरा ते अगदी दारूच्या बाटल्या सर्व स्वच्छ करण्यात आला. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन सहभागी व्यक्तींनी कचरा गोळा केला, हा कचरा तब्बल ८ पोती होता. दुखःची गोष्ट की यात दोन पोती नुसत्या दारूच्या बाटल्या आणि तोडलेल्या काचेच्या बाटल्या होत्या. मनुष्यनिर्मित कचरा स्वच्छ झाल्यानंतर पद्मावती माची वरील अंबारखाना, उभ्या असलेल्या वास्तू, सदर मोठ्या वाड्याची स्वच्छता करण्यात आली. यावर वाढलेले गवत आणि झाडी झुडपे काढून जोते आणि वास्तू पुर्नउजेडात आणण्यात आल्या. पद्मावती तलावाच्या जवळील वाड्यांची जोती पूर्ण स्वच्छ करण्यात आली. याच माचीवर पूर्वीच्या काळात जास्त वास्तव्य असावे याचे प्रचिती एक एक वास्तू स्वच्छ करताना येत होती. किल्याच्या पूर्वेच्या तटात साखळीने शौचकुप आढळली, त्यांची सुद्धा स्वच्छता करण्यात आली. या माचीवर असणारे दोन पाण्याचे स्त्रोत असलेले टाकी आहेत. त्यामध्ये वाहून आलेल्या मातीचा गाळ आणि मागच्या भिंतीचे पडलेले घडिव दगड होते. या दोन्ही टाक्या स्वच्छ करुन पडलेल्या दगडांची ताल बाधुन घेण्यात आली. पद्मावती देवीचे देऊळ व त्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.




२) संजीवनी माची: एकुण या किल्याला ३ माची आहेत. सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी माची. या तिन्ही माचीची बांधणी म्हणजे दुर्ग स्थापत्यशास्त्राताचा एक उत्तम नमुना, चिलखती बुरूज, चोर दरवाजा, बेलाग बुरूज. व त्या माचीच्या संरक्षणाकरता असलेल्या चौक्या. सर्वप्रथम यामाचीला मार्गात असलेली चौकी स्वच्छ करण्यात आली. वाढलेली गवतझुडपे काढून मोकळी करण्यात आली. पडलेल्या दगडांची ताल त्याच जागी ताल बांधून घेण्यात आली. चिलखती तटबंदी मधील वाढलेले आणि वास्तूला धोकादायक असलेली झाडी स्वच्छ करण्यात आली. याच तटबंदी मध्ये असणारे चोर दरवाजे स्वच्छ करण्यात आले. जागोजागी पडलेल्या घडिव दगड त्याच जागी रचून ठेवण्यात आले. ज्यावेळेला याची स्वच्छता झाली त्यावेळी यामाचीचे रुप खूप देखणे होतें.


३) बालेकिल्ला: बालेकिल्याच्यावरील वास्तू, पाण्याचे स्त्रोत यांची अवलोकन करून स्वच्छतेला सुरवात करण्यात आली. या ठिकाणी भरपुर वाडे, अंबारखाने आहेत. त्याची प्रशस्तता पहाता हे नक्कीच जाणवते की येथे महाराजांच्या रहाण्यासाठी निर्मिती झाली आहे. किल्यावरील काम आणि वेळ कमी पडल्याने यांची स्वच्छता त्या मोहिमेच्या दिवसात पुर्णत्वास न्हेता असली नाही पण पुढील काळात हे काम पूर्ण करण्यात आले.


यामोहिमेमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आणि उत्साह वाखण्याजोगा आहे. यामोहिमेमुळे जोडले गेलेले लोक आजतागायत संस्थेच्या विविध मोहिमांमध्ये मावळ्याच्या शक्तीने आणि भक्तीने सामील होत आहेत. यामोहिमेमध्ये पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक पाईक म्हणून गडावर ३ दिवस आमच्या समवेत होते. त्यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व कामे चालू होती.

याकरता आम्ही शासनाचे ऋणी आहोत.


यामोहिमेची माहिती पुन्हा प्रसारित करण्याचे कारण म्हणजे यातुन संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या मोहिमांची माहिती व्हावी आणि दुर्ग संवर्धनासाठी आपल्यातील व्यक्ती जोडल्या जाव्यात हा हेतू आहे. टीव्हीवर, संमेलनात किंवा कधी किल्यावर जाऊन त्याच्या दुरावस्थेबद्दल चर्चा करणारे व्यक्ती आहेत. पणं ज्याचे संवर्धन करावयाचे आहे त्याची तांत्रिक अडचणी, आव्हाने काय आहेत हे जाणून घेयचे असेल तर अशा कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून तुमच्या चर्चेला कार्याच्या अनुभवाची जोड लाभेल.



सोबत जोडलेली काही प्रकाशचित्रे आपल्याला अधिक माहिती देतील.




आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/